students

गुणवत्ता नसलेल्या शाळा बंद करणार: जावडेकर

Webdesk | Friday, January 19, 2018 8:54 PM IST

पुणे : महाविद्यालयांप्रमाणे शाळांच्या गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या शाळा बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केली. राज्यसरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही गुणवत्तेच्या आधारे शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. 

प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज आठव्या भारतीय छात्र संसदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळांची खालावलेली गुणवत्ता व पटसंख्येचे कारण पुढे करून राज्य शासनाने नुकताच १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला राज्यभरातून विरोध होत असतानाच केंद्राने महाराष्ट्राचा हाच फॉर्म्युला देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात महाविद्यालयांचे दर ५ वर्षांनी मूल्यांकन करून त्यांची गुणवत्ता तपासली जाते. त्यानुसारच आता शाळांचेही मूल्यांकन केले जाणार आहे. शाळांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जावडेकर यांनी सांगितले.